हरिद्वार : बहुजननामा ऑनलाईन – “ज्यांना काही मान नाही, असे लोक एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करत आहेत”, अशा शब्दात स्वामी रामदेव (Baba Ramdev) यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्याची खिल्ली उडवत आयएमएवर हल्लाबोल केला. शुक्रवारी इंटरनेट मिडियाच्या एका लाइव्ह कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना योग गुरु बाबा रामदेव Baba Ramdev म्हणाले, “सध्या देशात धार्मिक, वैचारिक आणि सांस्कृतिक दहशतवाद वेगाने पसरत आहे. यातच आणखी एका नव्या प्रकारच्या ट्रिटमेंट दहशतवादाचीही भर पडली आहे. आपली लढाई त्याविरोधात आहे. अॅलोपॅथिकचा हा उद्योग जवळपास दोन लाख कोटींचा आहे. याविरोधात आपण लढत आहोत. सरकार आपल्या बाजूने असो वा नसो, भलेही सरकार विरोध करो, पण आपला लढा सुरूच राहील आणि त्यात आपण यशस्वी होऊ.”
रामदेव म्हणाले, त्यांचा कुठल्याही पॅथीसोबत कॉम्पिटिशन नाही, विरोध नाही. आकस्मिक स्थितीत अॅलोपॅथी उपचार आवश्यक असल्याचेही आपण मानतो, मान्यताही देतो. पण याचा अर्थ असा नाही, की केवळ हीच उपचार पद्धती आहे. अॅलोपॅथिक उपचार पद्धतीवर निशाणासाधत ते म्हणाले, आम्ही मानतो, की आपल्याकडे लाइफ सेव्हिंग ड्रग्स आणि अॅडव्हान्स सर्जरी आहे. पण आपल्याकडे या दोन गोष्टी असतील, तर आमच्याकडे ९८ गोष्टी आहेत. आयुर्वेद आणि निसर्गोपचार सर्जरी न करता आणि औषध न घेताच उत्तम आरोग्य देते. आणि १००० हून अधिक व्याधींवर इलाज करते, असा दावाही बाबा रामदेव Baba Ramdev यांनी केला.
“यावेळी देश आणि जगातील विविध रुग्णालयांत कोरोनावरील उपचारासाठी जी-जी औषधी वापरली जात आहे, त्यांपैकी कुठल्याही एका औषधाचे अद्यापही कोरोनावरील उपचार प्रोटोकॉलअंतर्गत क्लिनिकल ट्रायल झालेले नाही. मग, कोणत्या आधारावर या औषधांचा वापर रुग्णांसाठी केला जात आहे”, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.