बहुजननामा ऑनलाईन – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाउन संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेऊन चालणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच उद्यापासून दुकान उघडण्याच्या व्यापाऱ्यांच्या भूमिकेबद्दलही आज, उद्या निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या कडक निर्बंधावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. 10) सायंकाळी 5 वाजता सर्वपक्षांचे नेते, विरोधी पक्षनेते, महाविकास आघाडीमधील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीत दहावी आणि बारावीची परीक्षा तसेच निर्बंध शिथिल करायचे की अधिक कठोर करायचे यावर विचारविनिमय केला जाणार आहे. दरम्यान रुग्णसंख्या कमी होत नसल्याने निर्बंघ अधिक कडक करण्याचा सल्ला कृती दल व अन्य तज्ज्ञांनी सरकारला दिला आहे.