मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील ग्रंथालये सुरू करण्यात यावीत, या मागणीसाठी ग्रंथालयांचे विश्वस्त आणि संचालक मंडळाने नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सामंत यांना फोन लावला. त्यावेळी सामंत यांनीच तसे संकेत दिल्याचे समजते. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जयंती दिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जात असून याच दिवसापासून पुन्हा ग्रंथालये सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत हे सध्या आजारी असल्याने वाचनालये सुरू करण्याच्या आदेशाला अंतिम स्वरूप देण्याची औपचारिकता बाकी आहे. गुरुवारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून वाचन प्रेरणा दिनापासून वाचनालये सुरू करावी, अशी मागणी वाचनालयांनी केली आहे.
लॉकडाऊननंतर सहा महिन्यांपासून वाचनालये बंद असल्याने हजारो पुस्तके वाचकांकडे अडकून पडली आहेत. पुस्तकांचे शुल्कही रखडले आहे. पुस्तकांना सॅनिटाइझ करणे, वाळवीप्रतिबंधक उपाय करणे, वाचनालयांत काम करणार्यांना पगार देणे, अशा अनेक खर्चांमुळे वाचनालयांची आर्थिककोंडी झाली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मराठी भाषा विकास विभागाकडे असलेली ग्रंथालये उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरित केली होती. लॉकडाऊनमुळे महाविद्यालयांतील ग्रंथालयेही बंद आहेत. वाचनालयेही सर्व नियम पाळून सुरू करावीत. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी व आर्थिक गर्तेतून वाचनालयांना बाहेर काढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलावे, अशी मागणी वाचनालये आणि वाचकांकडून केली जात आहे.