मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – जळगावातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या घटनेवरुन विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर घटनेसंदर्भात सहा वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली असून तेथे कोणतेही गैरकृत्य घडला नसल्याचा निष्कर्ष समितीने अहवालात काढल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली. वसतिगृहातील महिलांनी सांंस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. एक महिला घागरा घालून नाचत होती. मात्र, गरम होत असल्याने तिने घागरा काढून ठेवला, असे चौकशीतून समोर आल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.
गृहमंत्री देशमुख म्हणाले की, जळगावातील कथित घटनेसंदर्भात विविध खात्यांतील सहा महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने वसतिगृहातील सर्व 17 महिलांशी चर्चा केली असून 41 जणांच्या साक्षी नोंदविल्या आहेत. त्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. तक्रारदार महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे निदर्शनास आले आहे. महिला वसतिगृह असल्याने तिथे पुरुष अधिकारी आत जाऊ शकत नाही.
पोलिसांनी त्या कथित घटनेचा व्हिडीओ काढला असे सांगितले जात असले तरी असा कोणताही व्हिडीओ पुरावा म्हणून समितीला मिळाला नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. दरम्यान सदर वसतिगृह महिला व बालविकास विभागामार्फत चालविले जाते. ज्या महिलेने तक्रार केली, तिची मानसिक स्थिती ठीक नाही, असे या खात्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत माहिती देताना सांगितले.