मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पडण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांनी सभागृहात लावून धरला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार संवेदनशील नसल्याचे म्हटले. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी निवेदन सादर करत सहा महिला अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल पटलावर मांडला.
जळगावच्या शासकीय वसतिगृहासंदर्भात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सहा विविध खात्याच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती. नेमण्यात आलेल्या समितीने आशादीप शासकीय वसतिगृहात जाऊन संपूर्ण घटनेची चौकशी केली. तेथील महिलांना भेटून विचारपूस केली. जवळपास 41 साक्षीदारांना भेटून एक अहवाल तयार करण्यात आला. महिला अधिकाऱ्यांनी अहवाल दिला असून त्या बातमीत तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख दिले.
काय म्हणाले अनिल देशमुख ?
आशादीप महिला वसतिगृहात 20 फेब्रुवारी रोजी मनोरंजनाचा कार्यक्रम करावा म्हणून गाणी म्हटली, डान्स केला. त्यावेळी एका महिलेला गरबा डान्स करताना त्रास होऊ लागला. त्यामुळे तिने अंगावरील ब्लाऊजसारखा ड्रेस काढला. त्यावेळी तिथे कोणताही पुरुष पोलिस अधिकारी उपस्थित नव्हता. त्याठिकाणी केवळ महिला पोलीस अधिकारीच होते. एकूण 17 महिला होत्या. रत्नमाला सोनार या महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. मात्र, या महिलेच्या वेडसरपणाबद्दलच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. यामुळे सहा वरिष्ठ महिलांच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार जळगावात पोलिसांनी महिलांना नाचविल्याची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिले.
फडणवीसांकडून कारवाईची मागणी
जळगाव येथे घडलेल्या घटनेचा उल्लेख करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी आजपासून स्वत: राष्ट्रपती राजवटीसाठी मागणी करणार आहे. आमच्या आई-बहिणी सुरक्षित नसेल, तर एकच पर्याय आणि तो म्हणजे राष्ट्रपती राजवट. मुनगंटीवारांची बाजू लावून धरत देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकशाहीमुळे सरकार बरखास्तीची मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे. यामुळे मुनगंटीवारांच्या मागणीत गैर नाही. कारण घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. केवळ बातमी असती तर गोष्ट वेगळी होती. मात्र, त्या मुलीला नग्न करुन पोलीस नाचवत असल्याचा व्हिडीओ या ठिकाणी आला आहे. त्यामुळे आपण यावर संवेदनशीलतेने तातडीने कारवाई करण्याची मागणी फडणवीस यांनी केली.