मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी खळबळ जनक खुलासा केला आहे. आपल्या जीवाला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून धोका असून उद्या माझं काही बरं वाईट झाल्यास त्याला नांगरे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील. अशा खळबळ जनक दावा त्यांनी केला आहे.
उच्च न्यायालये मराठा आरक्षण वैध ठरवल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे. त्याचबरोबर हे आरक्षण न्यायालयीन शिस्तीचा भंग असून याविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी देखील सदावर्ते यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.
त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील आरोप केले आहेत. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील तसेच जाधव आडनावाचे एक पोलीस अधिकाऱ्यांचे त्यांनी नाव घेतले आहे. हे दोन अधिकारी मराठा असल्याने त्यांच्या कडून देखील आपल्या जीवाला धोका असल्याचे ते म्हणाले. उद्या माझं काही बरं वाईट झाल्यास त्याला नांगरे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
मराठा समाजाला राज्य सरकारने १६ टक्के आरक्षण दिले होते. त्यानंतर त्याविरोधात अनेक जणांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या यांच्यामध्ये जयश्री पाटील यांची बाजू गुणरत्न सदावर्ते हे मांडत होते. मात्र काल न्यायालायने निर्णय देताना मराठा आरक्षणाला अखेर मुंबई हायकोर्टाने वैध ठरविले. सोळा टक्के आरक्षण देता येणार नाही, नोकरी आणि शिक्षण यामध्ये १२ ते १३ टक्के मर्यादा आणली पाहिजे असे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे आता सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या निर्णयात हायकोर्टाने शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण वैध आहे असं म्हटलं आहे.