पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत ‘ भाजपने विश्वासघात केल्याचे म्हंटले होते, त्याला पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. ‘कोणी कोणाचा विश्वासघात केला. हे जनता ठरवेल’ असे त्यांनी सुनावले. एवढेच नाही तर त्यांनी मध्यावधी निवडणुकांचीही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पुण्यातील एका पत्रकार परिषदे दरम्यान बोलताना चक्क चंद्रकांत पाटील यांनी मध्यावधी निवडणुकांची शक्यता वर्तवली आहे. याबाबत बोलताना पाटील म्हणाले की, ‘लोकांना माहिती आहे कोणी कोणाचा विश्वास घात केला. ज्यांना वाटत असेल हे सरकार जास्त काळ चालेल तर असे काही होणार नाही. त्यामुळे ठाकरे असे बोलत असतील तर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान मध्यावधी निवडणुका झाल्या तर कोणी कोणाचा विश्वासघात केला हे लोक ठरवतील.”
दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार जेमतेम कामाला सुरुवात करत असताना चंद्रकांत पाटील यांच्या अंदाजाने मात्र राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे. आता यावर काँग्रेस, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस काय उत्तर देणार याकडेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.