बहुजननामा ऑनलाईन – संपुर्ण जगाच्या लोकसंख्येपैकी एक मोठी लोकसंख्या आशिया खंडातही राहते. मात्र जागतिक बँकेच्या अहवालानुसार २०१८ मध्ये ७८.३ दशलक्ष लोक दारिद्र्य रेषेखालील जगत आहेत. त्यापैकी ३३ टक्के लोक आशियामध्ये राहतात, तर ९ टक्के लोक पूर्व आशिया आणि आशिया पॅसिफिकमध्ये राहतात. मात्र आशिया खंडातील वीस कुटुंब अशी आहेत. ज्याच्या संपत्तीतून वीस गरीब देशांची अर्थव्यवस्था चालू शकते.
तथापि, आशिया खंडात पैसे नाहीत असे नाही. पण आशियातील बराचसा पैसा काही श्रीमंत कुटुंबांपुरताच मर्यादित झाला आहे. जर या संपत्तीचा वापर केला तर आशियातील २० गरीब देशांच्या अर्थव्यवस्था चालू शकतील इतकी संपत्ती या कुटुंबांकडे आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालानुसार, या वीस कुटुंबांची एकूण संपत्ती सुमारे ४५० अब्ज डॉलर्स (38.9 लाख कोटी रुपये) इतकी आहे. यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे कुटुंब पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्याचा धाकटा भाऊ अनिल अंबानी यांचा या यादीत १७ व्या क्रमांक लागतो. या यादीत शापूरजी पालनजी ग्रुप आणि हिंदुजा ब्रदर्स यांचादेखील समावेश आहे.
आशियातील पहिले पाच श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी यांची (रिलायन्स इंडस्ट्रीज) संपत्ती ५०.४ अब्ज डॉलर्स, वॉल्टर क्वाक पिंग शँग- (हाँगकाँग) ३८ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे. तर त्यांच्यानंतर या यादीत धानिन चेरवॉन्ट (बँकॉक) ३७.९ बिलियन डॉलर्स, रॉबर्ट बडी हार्टोनो (इंडोनेशियन) ३२.५ बिलियन डॉलर्स, ली बायंग चुल सॅमसंग (दक्षिण कोरिया) २८.५ बिलियन डॉलर्स यांचा क्रमांक लागतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवाडीनुसार, आशिया खंडातील गरीब देशांचे २०१८ मधील सकल राष्ट्रीय उत्पन्न ६६८ अब्ज डॉलर्स इतके आहे. या देशांची एकूण लोकसंख्या २१३ दशलक्ष आहे. तर भूतान हा आशियातील सर्वात कमी जीडीपी असणारा देश आहे.