औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – संविधानाने नागरिकांना अभिव्यक्ती, बोलणे, खाणे व धर्माचरण करण्याचे मूलभूत हक्क दिले आहेत. ते सर्व मोडीत काढून कोणी काय खावे यासाठी स्वयंपाकघरात कॅमेरे लावण्यात येत आहेत. अर्थात संविधानाला मोडीत काढून ‘बिग बॉस’चे राज्य प्रस्थापित करण्यात येत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे यांनी केले.
ताराई कला व विज्ञान महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेअंतर्गत ‘भारतीय संविधान काल, आज व उद्या ‘ या विषयावर त्या बोलत होत्या.
प्रारंभी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. निपाणी येथे होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अहिरे यांची निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने संचालक निमेश पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी रमेश शेळके होते. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. गणेश शिंदे यांनी केले. शाहीर चरण जाधव, डॉ. भाऊसाहेब झिरपे, रेणुका मोरे, पूजा झिने, कविता गायकवाड, सीमा सुरासे, रोहन वडघने, प्रा. गणेश इंगळे, प्रा. रामेश्वर म्हस्के, प्रा. सुनीता पाठक, प्रा. वैशाली गायकवाड, प्रा. शर्वरी पैठणकर, प्रा. लहू घोरपडे, डॉ. राजेश कात्यायनी, डॉ. रामेश्वर वाघचौरे, नीलेश सनवे, सचिन पांडव, संजीवनी बनसोडे उपस्थित होते.