अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सारखा पक्ष किंवा सत्तेत सहभागी होणारे आंबेडकरी नेते हे प्रामाणिकपणे भीममार्गावर चालणारे नाहीत, अशा शब्दात बसपाचे खा. अशोक सिद्धार्थ यांनी टीका केली. शिवजयंती, गाडगेबाबा जयंती व संत रविदास महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून बामसेफ या संघटनेतर्फे ग्रँड महफिल येथे बहुजन परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्घाटक म्हणून खा. सिद्धार्थ बोलत होते. ते म्हणाले, आर्थिक व सामाजिक प्रगती साधायची असेल, तर सत्ता हाच एकमेव मार्ग आहे. त्यासाठी बहुजन वर्गाने जागृत झाले पाहिजे.
बाबासाहेबांच्या नावावर रामदास आठवले, रामविलास पासवानसारखे काही नेते सत्तेत सहभागी होतात; मात्र त्यामागे त्यांचा वैयक्तिक स्वार्थ असतो. आपणही केवळ बाबासाहेबांचे नाव घेतो; परंतु त्यांची शिकवण पायदळी तुडवितो. असेच तथाकथित अनुयायी दरवर्षी लाखोंच्या संख्येने दीक्षाभूमीवरही जातात. त्याचवेळी बहुजन वर्गातील धोबी, महार, चांभार आदी सर्वच वर्गात बेटीरोटी व्यवहार करताना जातपात पाहतात. आपण आता एससी, एसटी, अल्पसंख्याक , ओबीसी असा वाद विसरून एकत्र आलो पाहिजे. तसे केल्यावरच आपण मनुवादी शक्तींना हरवू शकतो. कार्यक्रमात आयआरएस सुबोचन राम, संपादक शंभुकुमार सिंह यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी बसपा गटनेते चेतन पवार, नगरसेवक ऋषी खत्री, माजी नगरसेवक दीपक पाटील यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील अनेक नागरिक उपस्थित होते.