जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक लढा सर्वांच्या स्मरणात असून ५०० जणांनी २८००० सैन्य असलेल्या पेशव्यांचा केलेला पराभव आणि पूर्वजांच्या शौर्याला मानवंदना म्हणून शहरातून भीमा कोरेगावच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली. त्याबरोबरच लोकशाहीला घातक असल्याचे सांगत ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रादेखील काढण्यात आली.
कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारला. रेल्वे स्थानकावरून वाजंत्रीच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भीमा कोरेगावची ऐतिहासिक लढाई सर्वांना आठवणीत रहावी आमच्या पूर्वजांचे शौर्य व इतिहास सर्वांना कळावा तसेच ईव्हीएम मशीन लोकशाहिला घातक असल्याने बॅलेट पेपरद्वारे २०१९ ची निवडणूक व्हावी, म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे बहुजन क्रांती मोर्चाचे मुकेश नेतकर, ओबीसी महासंघाचे किसनराव जोर्वेकर, बंजारा क्रांती दलाचे राकेश जाधव, पारधी समजाचे आप्पा साळुंखे यांनी सांगितले.
कोरेगाव भीमाची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव- भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. १ जानेवारी इ. स. १८१८ रोजी इंग्रज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते. ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टाँटन करीत होता तर साम्राज्याच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्याचे नेतृत्व सेनापती दुसरा पेशवा बाजीराव दुसरा करीत होता. इंग्रजांच्या सैनिकामध्ये बॉम्बे नेटिव्ह लाइट इन्फेंट्री तुकडीतील ५०० महार सैनिक होते. त्यांनी पेशव्यांचा पराभव केला होता.
पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते. महार, मांग चांभार व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने लढले आणि त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला; अशा पूर्वजांचा इतिहास लोकांना कळावा म्हणून हा उपक्रम असल्याचे आयोजक मुकेश नेतकर यांनी सांगितले.