कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – देशाच्या विकासाचा, नियोजनाचा सिद्धांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला; मात्र दुर्दैवाने त्यांच्या नावाचा उललेख कुठेच येत नाही, असे प्रतिपादन प्रा. डॉ. पी. एस. कांबळे यांनी केले. छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या संयुक्त विचारातून हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे पार पडलेल्या ऐतिहासिक दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्ग परिषदेने शताब्दी वर्ष पूर्ण केले आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन शाहू स्मारक भवन येथे सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले होते. व्याख्यानाच्या दुसऱ्या दिवशी वंचित समाजाच्या विकासाची समस्या या विषयावर प्रा. डॉ. पी. एस. कांबळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत राहुल ठाणेकर यांनी केले. प्रतिमा पूजनाने व्याख्यानाची सुरुवात करण्यात आली.
डॉ. कांबळे म्हणाले, जात आणि द्रारिद्र्य या दोन समस्यांनी देशाला ग्रासले आहे. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित विकासाचे धोरण मांडले होते. त्याचबरोबर त्याची तीव्रतासुद्धा दाखवून दिली होती. देशाच्या विकासाचे धोरण, सिद्धांत त्यांनी मांडला होता. निव्वळ शेतीला प्राधान्य देऊन चालणार नाही तर त्यासाठी उद्योगाची जोड असणे आवश्यक आहे. भारतीय शेतीचा विकास हा अतिरिक्त मनुष्यबळावर झाला पाहिजे आणि यासाठी धोरण असणे महत्त्वाचे होते. यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या योजना आखल्या होत्या. त्या त्यांनी स्वत: तयार केल्या होत्या;मात्र याचे श्रेय अन्य लोकांनी घेतल्याने त्यांचे नाव कुणीही घेत नसल्याचे दिसून आले आहे.
तळातील दलित समाज विकासापासून वंचित राहिल्यामुळे नव्या समस्या, नवीन आव्हाने, बदलत चाललेली परस्थिती, सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्र आता जागतिकीकरणाच्या रेट्याखाली सुरू आहे. खासगीकरणाच्या प्रक्रियेमुळे अर्थिक शिथिलीकरणाच्या नावाने विविध क्षेत्रातून माघार घेण्याचे धोरण सरकार अवलंबत असल्याने याचा परिणाम वंचित घटकांवर होऊ लागल्याने खालच्या थरातील समाज आर्थिकदृष्ट्या मागे पडला आहे, असेही ते म्हणाले. यावेळी आनंद राणे, रमेश रत्नाकर, प्रा. विनय कांबळे, प्रा. ए. बी. कांबळे, उत्तम चोपडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सिद्धार्थ पद्माकर यांनी केले, तर आभार आनंद राणे यांनी मानले.