मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सरकारी कामाचा फटका केवळ सामान्यांना बसतो असं नाही. तो सरकारी व्यवस्थेत काम करणार्यालाही बसतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, राकेश साळुंखे. या पोलिस उपनिरिक्षक राकेश साळुंखे यांनी आपल्या वरिष्ठांकडे बदली करा अन्यथा, सामुहिक आत्महत्या करण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी केली आहे. त्यामुळे पोलिस दलात खळबळ माजली आहे. राकेश साळुंखे हे पोलिस उपनिरीक्षक पदावर काम करीत आहेत. त्यांना पत्नी आणि दोन मुले आहे. तसेच ते राष्ट्रपती पदक विजेते देखील आहेत. मात्र, बदली होत नाही म्हणून त्यांनी कुटुंबासह सामुहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. कारण वारंवार मागणी करूनही बदली मिळेना हेच आहे. मागील दोन वर्षांपासून ते बदलीसाठी अर्ज करीत आहेत. या बदलीसाठी त्यांनी अनेक अर्ज करूनही त्यांचा अर्ज प्रत्येकवेळी डावलण्यात आला आहे. राकेश साळुंखे हे राज्य उत्पादन शुल्क विभागात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे.
मुंबईमध्ये 2006 च्या ट्रेनमधील साखळी बॉम्बस्फोटावेळी या अधिकार्याने बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. माहीममध्ये याच बॉम्बस्फोटात राकेश साळुंखे हे जखमी झाले होते. राकेश साळुंखे यांनी जखमी अवस्थेतही ट्रॅकवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लोकांचे जीव वाचविले होते. दोन खांद्यावर दोन-दोन जखमींना घेऊन ट्रॅकवरून धावत माहीम स्टेशन गाठले होते. असे तीनवेळा करत त्यांनी प्रवाशांचे प्राण वाचविले होते. सुमारे पाच जणांना जीवदान देणार्या आणि राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करणार्या या अधिकार्याला राष्ट्रपती पदक जीवन रक्षा पुरस्काराने सन्मानित केले आहे. मात्र, आज हेच राकेश साळुंखे सामुहिक आत्महत्या करण्याची परवानगी वरिष्ठांकडे मागत आहेत.राकेश साळुंखे हे ट्रॅकवरून धावत ज्या जखमींना वाचवत होते यावेळी त्यांच्या हे लक्षातही नाही आलं की, त्यांच्या मणक्यांना प्रवाशांच्या वजनामुळे मोठी हानी पोहोचेल.
मागील 14 वर्षे राकेश आपल्या मणक्यांच्या उपचार घेताहेत. 2016 मध्ये अमरावतीला आणि त्यानंतर औरंगाबादला त्यांची बदली केली. यामुळे त्यांच्या उपचारातही खंड पडला.त्यानंतर बदलीसाठी राकेश यांनी अनेक अर्ज केले आणि आपल्या वरिष्ठांच्या वेळोवेळी भेटीगाठी घेतल्या. त्यानंतरही राकेश यांना मुंबईमध्ये बदली दिली नाही. मुंबईमध्ये उपचारासाठी घ्यावी लागणारी बिनपगारी रजा, उपाचारावर होणारा खर्च, औरंगाबादेत आणि मुंबईमध्ये परिवारासाठीचा खर्च या सगळ्यांचा ताळमेळ बांधताना राकेश यांना जीव नकोसा झाला आहे.सरकारी नियमानुसार बदली होणे अपेक्षित असतानाही आपला विचार केला नाही म्हणून राकेशनी थेट आपल्या वरिष्ठांच्याकडे सामुहिक आत्महत्येची परवानगी मागितली आहे.पण, परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. राकेश यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. त्यात या सगळ्या मानसिक त्रास होत आहे. त्यांच्या 20 वर्षांच्या मुलाने या सगळ्याचा ताण असह्य झाल्याने दोनदा आपला जीवाचे बरे वाईट करण्याचा प्रयत्न केला. सरकारी नियमात बसत असताना मुंबईमध्ये बदलीसाठी 40 जागा असतानाही देखील राकेश साळुंखे यांचा विचार का होत नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता यात मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप नाही केला तर 15 ऑगस्टला कुटुंबाच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल, असा इशारा देखील राकेश साळुंखे यांनी दिला आहे.