मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी लहूजी शक्ती सेनेने केली होती या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिखित आश्वासन दिल्याची माहिती लहूजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांनी दिली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यलयात ते बोलत होते. तसेच शिवसेना भाजप युतीला आपला पाठिंबा असल्याचे ही कांबळे यांनी यावेळी जाहीर केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लहुजी सेनेने चर्चा करून सनेच्या अनेक मागण्या लिखित स्वरूपात मान्य केल्या असून मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याचे आश्वासनही दिले असल्याची माहिती कांबळे यांनी दिली.
अनुसूचित जातीमधील काही जातींवर अन्याय होत असल्यामुळे अनुसूचित जाती मध्ये अ, ब, क, ड अशी वर्गवारी करून उपेक्षित घटकांना न्याय देण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे मांडली असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय आरक्षणात अनुसूचित घटकांना अधिक प्रतिनिधित्व मिळण्याच्या हेतूने कायद्यात बदल करण्याची मागणीही लहुजी शक्ती सेनेने केली आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा सकारात्मक झाली असल्याचेही ते बोलले .