अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – आपले कर्तव्य पार पडत असताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अंगणवाडी सेविका उषाताई पुंड यांच्या कुटुंबीयांना महाविकास आघाडी सरकारने ५० लाखांचा धनादेश मदत म्हणून दिला आहे. राज्यातील ही पहिलीच मदत असून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते हा धनादेश पुंड कुटूंबियांना देण्यात आला.
दरम्यान, शासनाने ही मदत दिल्याने कुटुंबातील सदस्यांना गहिवरून आले. घरची कर्ती महिला गेल्यानंतर कुटुंब उघड्यावर पडले असताना ही मदत मिळाली असे सांगत पुंड कुटुबियांनी शासनाचे आभार मानले.
मदत नाही,माझे कर्तव्य!
राज्यभरात कोरोनाच्या काळात सेवा देत असताना माझ्या ८ अंगणवाडी ताई शहीद झाल्या. त्यांच्या कुटूंबियांना मी ५० लाख रुपये अनुदान द्यायचं घोषित केले होते. @INCIndia @INCMaharashtra @RahulGandhi @kcvenugopalmp @HKPatil1953 @bb_thorat @NANA_PATOLE @MahaDGIPR pic.twitter.com/wPqdZ85qU9— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) March 14, 2021
तुटपुंज्या मानधनावर काम करणारा अंगणवाडी सेविका हा घटक. मात्र, कोरोना काळात जीवाची पर्वा न करता अंगणवाडीतील बालकांना घरोघरी जाऊन अनेक अंगणवाडी सेविकांनी आहार पोहोचवून दिला. हे काम करत असताना राज्यातील ८ अंगणवाडी सेविकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील रामा येथील उषाताई पुंड एक होत्या. कोरोना काळात सर्वत्र संचारबंदी होती कोणीही बाहेर येत नव्हते. त्या काळात उषाताई मात्र घरोघरी जाऊन बालकांना पोषण आहार पोहोचून देत होत्या. यातच त्यांना कोरोनाची लागण झाली व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे उषाताई पुंड यांचं कुटुंब उघड्यावर पडले.
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी उषाताई पुंड यांच्या घरी जाऊन कुटूंबियांची सांत्वन केले. त्याचबरोबर त्यांना ५० लाखाचा धनादेश सुपूर्द केला. कोरोना योद्धयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे अशी प्रतिक्रियाही ठाकूर यांनी दिली.