बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबई, दि. 4 फेब्रुवारी ः शर्जिल उस्मानी याने हिंदुविरोधी केलेल्या वक्तव्यांनंतर भाजपने त्याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीने शर्जिलला पळून जाण्यास मदत केलीय, असा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केलाय. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
’शर्जिल उस्मानीला महाराष्ट्र व मुंबईबाहेर पळून जाण्यासाठी मदत करण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारने केलंय. शर्जीलला पळून जायला दिल्यानंतर आणि भाजपने 2 दिवस आंदोलन केल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करु म्हणणे म्हणजे पश्चातबुद्धी आहे. शिवसेनेने हिंदूना सडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचे काम का केलं स्पष्ट करावं?,’ अशी मागणी आशिष शेलार यांनी केलीय.
’शर्जिलने केलेल्या अवमानकारक टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणे याचा अर्थ यांचं डोकं ठिकाणावर आहे का?, अटक केली जाईल. परंतु, परिषदेला परवानगीच का दिली?,’ असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी केलाय.
भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आतंरराष्ट्रीय कलाकारांनी देखील याची दखल घेत ट्विट केलंय. या ट्विटनंतर भारतात 2 गट पडल्याचे पाहायला मिळतंय. काही राजकीय पक्षांनी याचं स्वागत केलंय तर, भाजपने यावर टिप्पणी केलीय. आशिष शेलार यांनीही यावर भाष्य करत शिवसेनेला सुनावलंय. शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झालीय.
’महाराष्ट्रावर परराज्यातून कोणी टीका केली तर यांना महाराष्ट्रद्रोह आठवतो. पण, परदेशातून कोणी आपल्या देशातील विषयावर टिप्पणी, बदनामी केली तर यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. हे परदेशातील कनेक्शन काय आहे? हे संजय राऊत यांनी जनतेसमोर मांडावं,’ असं म्हणत शिवेसेनेवर निशाणा साधलाय.
यावेळी आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केलीय. ’सुप्रिया सुळे यांनी आंदोलक शेतकर्यांना जरुर भेटावं, हरकत नाही. पण, बारामतीत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला परवानगी का दिली आहे?. बारामतीत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग फायदेशीर ठरते अन् देशात ती चुकीची कशी ठरते?, याचं उत्तर सुप्रिया सुळेंनी द्यावं,’ असं आशिष शेलार यांनी म्हटलंय.