बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे उत्तराखंडला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. राज्य सरकारच्या विमानात राज्यपाल बसले होते. मात्र विमानाला उड्डाण करण्यास मंत्रालयाकडून परवानगी नसल्याचे समोर आले. या प्रकरणावरून रिपाइंचे रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारचे वर्तन अतिशय खराब आहे, राज्यपालांना सरकारी विमान वापरण्याचा अधिकार आहे. राज्यपालांचा हा अपमान आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची माफी मागावी, असे आठवले यांनी म्हटले आहे. दिल्लीतील संसद भवनाबाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मत व्यक्त केलं आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद दिवसेंदिवस आणखीच वाढताना दिसत आहेत. आता, पुन्हा एकदा राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये नवा वाद उफाळून आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हवाई प्रवासालाच मुख्यमंत्री कार्यालयानं परवानगी दिली नसल्याने भाजपा नेत्यांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे.
त्यामुळे राज्यपाल विमानातून खाली उतरले आणि प्रवासी विमानाने नियोजित दौऱ्यासाठी उत्तराखंडला रवाना झाले. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून बुधवारी रात्री उशीरापर्यंत राज्यपाल कोश्यारी यांना उत्तराखंड इथं जाणाऱ्या विमानाला उड्डाण करण्यास परवानगी दिली गेली नव्हती. तसेच यावरून शिवसेनेकडून राज्य सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यपाल कोश्यारी राज्य सरकारच्या विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नाकारण्यात आल्यानं त्यांना विमानातून खाली उतरावे लागले होते. यासंदर्भात भाजप नेत्यांसह आठवले यांनीही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.
दरम्यान, या प्रकरणेवरून भाजपा नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर टीका केली आहे. तर, शिवसेनेचे नेते हे सरकारची भूमिका सांगत आहेत. तर त्यावर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असून राज्य सरकारचे वर्तन अतिशय खराब आहे, राज्यपालांना सरकारी विमान वापरण्याचा अधिकार आहे. राज्यपालांचा हा अपमान आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची माफी मागावी, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे.