नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Airtel, Vodafone-Idea आणि Reliance Jio ने त्यांच्या प्रीपेड योजनांचे नवीन दर सादर केले आहेत. या दूरसंचार कंपन्यांनी त्यांचे प्रीपेड दर ४३ टक्क्यांनी वाढवले आहेत. टेलिकॉम कंपन्यांच्या मते ARPU ला ठीक करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. कंपन्यांनी आपल्या व्हाइस कॉलिंगच्या दराबरोबर डाटाचा दर देखील वाढवला आहे. सध्या भारतात डाटाचे दर अन्य विकसनशील आणि विकसित देशांच्या तुलनेत ५० टक्के कमी आहेत. तर टेलिकॉम कंपन्याचा ARPU वर्षानुवर्षे कमी होत आहे. टेलिकॉम कंपन्याचे ARPU २०१० मध्ये १४१ रुपये प्रति महिना होते जे आता २०१९ मध्ये कमी होऊन ८० रुपये प्रति महिना झाले आहे.
टेलिकॉम कंपन्यांनी केवळ प्रीपेड योजनांचे दर वाढविले आहेत. त्याच वेळी, टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी कोणतीही नवीन योजना आणली नाही किंवा त्यांची अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सेवा मर्यादित केली नाही. एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या दोन्ही आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांच्या पोस्टपेड योजना ४९९ रुपयांपासून सुरू होतील. या दोन कंपन्यांनी अद्याप पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी कोणतेही नवीन दर जाहीर केलेले नाहीत. एअरटेल आपल्या पोस्टपेड वापरकर्त्यांना एसएमएसद्वारे सांगत आहे की त्यांच्या योजनांमध्ये कोणताही बदल होणार नाही आणि त्यांना पूर्वीसारख्या सर्व सुविधा मिळतील.
ज्या एअरटेल आणि वोडाफोन-आयडीयाच्या यूजर्सने पहिल्यांदाच प्लॅन रिचार्ज केले आहेत, ते कायम ठेवण्यासाठी यूजर्सला किमान ४९ रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. जिओने देखील ऑल इन वन प्रीपेड प्लॅनमध्ये ४० टक्के वाढ केली आहे. ज्यात यूजर्सला फ्री FUP मिनिट्स ऑफर करण्यात आले आहेत. जे यूजर्स अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी वापरू शकतात. तसेच यात जिओ टू जिओ कॉलिंग फ्री आहे. लिमिट क्रॉस केल्यानंतर इतर नेटवर्कवर ग्राहकांना ६ पैसे प्रति मिनिट दराने पैसे पडतील.