नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छोट्या बचत योजनांच्या बाबतीत लोकांचा पोस्ट ऑफिसच्या योजनांवर अधिक विश्वास आहे. पण तुम्हाला माहित आहे का की एखाद्या आर्थिक वर्षात तुम्ही ठरवलेल्या, मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढले तर तुम्हाला टीडीएस द्यावा लागू शकतो. एका वृत्तसंस्थेनुसार नुकत्याच केंद्र सरकारने एक तरतूद आणली असून त्याअंतर्गत तुम्ही जर १ सप्टेंबर २०१९ नंतर आपल्या खात्यातून १ कोटींपेक्षा जास्त पैसे काढले असतील तर त्यासाठी तुम्हाला २ टक्के टीडीएस देणे गरजेचे आहे. पोस्ट ऑफिसला खातेधारकाचे पॅन कार्ड त्यांच्या सिस्टिममध्ये नोंदणीकृत असल्याचे सुनिश्चित केले पाहिजे.
केंद्र सरकारने इन्कम टॅक्स कायदा १९६१ मध्ये फायनान्स ऍक्ट २०१९ अंतर्गत ही तरतूद केली असून यात आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये १ कोटींपेक्षा जास्त रक्कम काढल्यास २ टक्के टीडीएस वजा करणे बंधनकारक केले आहे. १ सप्टेंबर २०१९ पासून याची अंमलबजावणी पण करण्यात आली आहे.
वरील नियम १ सप्टेंबर पासून लागू करण्यात आल्यामुळे १ एप्रिल २०१९ ते ३१ ऑगस्ट २०१९ दरम्यान रक्कम काढण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. सिबीडीटीने यावर अगोदरच स्पष्टीकरण देत “लोकांची चिंता दूर करण्यासाठी हे स्पष्ट केले जाते की कलम १९४N १ सप्टेंबर २०१९ पासून लागू केले गेले आहे. अशातच जर तुम्ही १ सप्टेंबर २०१९ नंतर १ कोटीपेक्षा जास्त रक्कम काढली तर तुम्हाला २ टक्के टीडीएस भरावा लागेल,” असे सांगितले आहे.
हा नियम संपूर्ण आर्थिक वर्षासाठी लागू केला असल्याने रोख रक्कम काढण्याची संपूर्ण रक्कम आर्थिक वर्षाच्या आधारे मोजली जाईल.