पुणे : बहुजननामा ऑनलाईन – विद्यार्थ्यांनी राजकीय भूमिका विद्यापीठाच्या कॅम्पसबाहेर घेण्यास हरकत नाही असा सल्ला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. याशिवाय विद्यापीठात मात्र राजकीय भूमिका नको असे त्यांनी म्हटले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत तावडे बोलत होते.
यावेळी बोलताना विनोद तावडे म्हणाले की, “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमावली तयार केलेली आहे. विद्यार्थ्यांनी यात कसलीही राजकीय भूमिका घेऊ नये तसेच सरकार, शासनविरोधी कृत्य करू नये” असे त्यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, “राष्ट्र विरोधी, समाज व जातीय विरोधी व राजकीय पक्षांचे उपक्रम राबवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी.” असे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान या नियमांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केल्याची दिसली.
पुढे तावडे म्हणाले की, “विद्यापीठात कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार होता कामा नये. विद्यार्थ्यांना राजकीय भूमिकेशिवाय विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर नेतृत्त्व करता आले पाहिजे. आमच्यावेळी आम्ही जी आंदोलने केली ती आंदोलने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर होती. राजकीय आंदोलने आम्ही अलका टॉकीज चौकात केली. दोन्हीची गल्ल्त आम्ही कधी केली नाही.
याबाबत एनएसयुआयची रुक्साना पाटील म्हणाली की, “विद्यापीठाने तयार केलेल्या निमावलीमध्ये स्पष्टता नाही. नवीन नियम हे बालीश आहेत. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, मेस हीच चर्चा करण्याची ठिकाणं असतात. तिथे जर बोलण्यावर बंदी घालण्यात येणार असेल तर विद्यार्थ्यांनी आपले म्हणणे मांडायचे कुठे ? हे नियम म्हणजे विद्यार्थ्यांच्या लोकशाहीवरच हल्ला आहे. आम्हाला आमच्या अडचणी घेऊन व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवता येत नसेल किंवा आपल्या हक्काची जपणूक करता येत नसेल तर कसले आम्ही संविधानाला अपेक्षित नागरिक बनू ? नियमांमध्ये देशविरोधी कृती करु नये असे म्हणण्यात आले आहे. सरकारविरोधी किंवा व्यवस्थेविरुद्ध बोलणे जर देशाविरोधी असेल तर लोकशाही धोक्यात आल्याचे लक्षण आहे.”