पुणे : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या 24 फेब्रुवारीला घेण्यात येणाऱ्या इयत्ता ५ वी व ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. परीक्षेसाठी व्यवस्थित नियोजन करण्याच्या सक्त सूचना राज्यातील शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना परीक्षा परिषदेकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देण्यात आल्या आहेत.
पाचवीसाठी 5 लाख 12 हजार 591 विद्यार्थी परीक्षेला बसणार असून यासाठी 3 हजार 416 केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. इयत्ता आठवीसाठी 3 लाख 53 हजार 239 विद्यार्थी परीक्षेला बसणार असून या विद्यार्थ्यांसाठी 2 हजार 441 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे.एकूण 8 लाख 65 हजार 830 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसणार असून यासाठी 5 हजार 869 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. नवीन बदललेल्या वेळेनुसार आता शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर-1 हा दुपारी 1 ते 2.30, तर पेपर-2 हा दुपारी 3.30 ते 5 यावेळेत होणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप, शिष्यवृत्ती परीक्षा विभागाच्या उपायुक्त स्मिता गौड, अधिक्षक संजय काळे आदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील अधिकाऱ्यांकडून परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला.