औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – अल्पवयीन मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडून आठ दिवस उलटून गेले तरी अजूनही या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली नाही. याचा निषेध नोंदवत बंजारा समाजाने दोन तास रास्ता रोको केले. तत्पूर्वी शहरातून निषेध यात्राही काढण्यात आली. दिवसभर वडवणीतील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.
ब्रह्मनाथ तांडा येथील स्वाती राठोड ही तेलगाव येथील विद्यालयात नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. याच विद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी तिची छेड काढली होती. छेडछाडीमुळे कंटाळून स्वातीने आठ दिवसांपूर्वी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. बंजारा समाजाने या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी ,पीडित कुटुंबीयांना दहा लाख रुपये मदत द्यावी, आरोपीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासह इतर मागण्यांसाठी बीड-परळी हायवे रोडवर तब्बल दोन तास रास्ता रोको केले.