मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर महाविकास आघाडीच्या सगळ्याच पक्षांमध्ये नाराजीचे सूर उमटले होते. त्यात शिवसेनेचे अब्दुल सत्तार हेही नाराज असून ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार यांच्यात वाद निर्माण झाला होता. परंतु हा वाद आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिटवला असल्याची माहिती मिळत आहे. तसेच उद्धव यांनी सत्तार यांना शांत राहण्याची सूचना दिल्याचेही सांगितले जात आहे.
वाद निर्माण झाल्यामुळे अब्दुल सत्तार, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांना मुंबईला बोलावून घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांची कानउघडणी केली असल्याची माहिती मिळत असून यामुळे शिवसेनेला अपमान सहन करावा लागला आहे. अब्दुल सत्तार यांच्याबद्दल शिवसेनेत वाद निर्माण झाला होता. तसेच महाविकास आघाडी तयार होत असतानाही सत्तार माध्यमांसमोर येऊन शिवसेनेच्या आमदारांना दिलेल्या सूचना माध्यमांना सांगत होते. ते पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत होते, म्हणून त्यांना पक्षाकडून समजावण्यातही आले होते.
परंतु सत्तार परत एकदा आक्रमक झाले असून त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या या अफवा असल्याचे ते सांगत आहेत. तसेच त्यांना माध्यमांपासून दूर राहण्याचे आदेशही पक्षाकडून देण्यात आले आहेत.