मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीत जनतेनं भाजप आणि शिवसेनेला बहुमत दिलं. निकाल लागून 12 दिवस उलटल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. मुख्यमंत्री पद शिवसेनेला न देण्यावर भाजप ठाम आहे. तर शिवसेनेला मात्र अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद हवं आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली होती. यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते असं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे आदी नेते उपस्थित होते.
माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, “महाजनादेश महायुतीसोबत आहेत. आम्ही शिवसेनेची वाट पाहू. सरकार आमचंच बनणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार बनणार हे आम्ही स्पष्ट केलं आहे. आम्ही शिवसेनेला प्रस्ताव दिला आहे. प्रस्ताव काय आहे हा जाहीरपणे सांगता येणार नाही. मात्र सरकार आमचंच येणार आहे.”
चंद्रकांत पाटील यांनीही माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, “शिवसेनेनं आम्हाला प्रस्ताव दिलेला नाही. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील. शिवसेनेसाठी आमची दारं नेहमीच खुली असतील. आम्ही सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणार आहोत. जनतेनंही भाजप-शिवसेनेला कौल दिला आहे. लवकरच सरकार स्थापन होईल. भाजपच्या संसदीय समितीची परवानगी मिळाली आहे.” असेही त्यांनी सांगितले होते.