बहुजननामा ऑनलाईन – शिक्षण क्षेत्रात बारा ते चोवीस वर्ष सेवा केलेल्या शिक्षकांची पगारवाढ आता विद्यार्थ्यांच्या वार्षिक निकालावर ठरणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने हा आदेश जारी केला आहे. वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांच्या मागील तीन वर्षातील वर्गांचा निकाल ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे शिक्षकवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यात राज्यातील ग्रामीण भागातील शाळेचा निकाल कमी लागत असल्याने ग्रामीण भागातील शिक्षकांची पात्रता असूनही त्यांना पगारवाढ मिळणार नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पुर्वीच्या वेतश्रेणीनुसार बारा ते चोवीस वर्षे सेवा देणारे शिक्षक निवड आणि वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी अर्ज करत. त्यांना यशदा संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात येत. या प्रशिक्षणात अभ्यायसक्रमातील बदल, आधुनिक पद्धतीने अभ्यासक्रम शिकविणे, नवीन तंत्रज्ञानाची माहिती, लहान मुलांची मानसिकता याविषयी मार्गदर्शन करण्यात येत होते. प्रशिक्षणानंतर त्यांना निवड किंवा वेतनश्रेणी लागू करण्यात येत होती. मात्र नुकतीच वरिष्ठ आणि निवडश्रेणी लागू असलेल्या शिक्षकांचा शाळेतील गत तीन वर्षांचा निकाल तपासण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सुरवातीला प्राथमिक स्तरावर जिल्ह्यातील २५ शिक्षकांच्या कामाकाजाचा अभ्यास करुन अहवाल तयार करण्यात येणार असून तो ३१ ऑगस्ट पर्यंत परिषदेकडे सादर केला जाईल.
शालेय परिक्षांचा निकाल फक्त शाळेतील अभ्यासक्रमावर अवलंबून नसून तो तितकाच बाह्य घटकांवरही अवलंबून असतो. अभ्यासक्रम सारखा असला तरी शहराच्या तुलनेत ग्रामीण, आदीवासी भागातील शाळांचा निकाल कमी लागतो. त्यामुळे अशा शाळेतील शिक्षकांची पात्राता असूनही त्यांना १२ ते २४ वर्षे सेवा देऊनही वेतनश्रेणी न मिळणे चुकीचे आहे. असे मत हंसराज मोररजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय मोरे यांनी व्यक्त केले आहे.