मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – लॉकडाऊन काळात पाठवलेल्या वाढीव वीजबिलांच्या मुद्द्याकडे तसेच वीजजोड तोडणीकडे लक्ष वेधत भाजप आमदारांनी सभागृहात तसेच सभागृहाच्या बाहेर प्रचंड गोंधळ घातला. सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.
विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घ्यावी अशी मागणी केली. त्यावरून भाजपा आक्रमक झाली. तत्पूर्वी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. वाढीव बिलासंदर्भातील फलक झळकावत या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधले. वीज कनेक्शनसह कृषी पंपाची वीज तोडण्याची कारवाई थांबवावी, अशी मागणी केली आहे. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर फडणवीस यांनी वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला. राज्यात अगोदरच कोरोनामुळे संकटात आलेल्या नागरिकांना वीजजोड तोडून पुन्हा अडचणीत आणले जात असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यावर पवार म्हणाले, जोपर्यंत ऊर्जा विभागाची वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य नागरिकांचे वीज कनेक्शन तोडणे थांबवण्यात येईल, असे स्पष्ट केले.