नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – शिक्षकांची समाजाप्रती महत्त्वपूर्ण भूमिका असून त्यांनी वस्तुनिष्ठ व विज्ञानवादी भूमिका घेऊन सामाजिक व शैक्षणिक कार्य करून विद्यार्थ्यांना खरा इतिहास सांगावा, असे प्रतिपादन अमोल मिटकरी यांनी केले. ते दीक्षाभूमी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या चौथ्या अधिवेशनात उद्घाटक म्हणून बोलत होते. त्यांनी यावेळी आपल्या प्रखर वाणीतून इतिहास समजावून सांगितला. वर्णव्यवस्था ही अतिशय घातक असून यात परिवर्तन आवश्यक आहे. हे परिवर्तन जिल्हा परिषद शिक्षकांमुळे शक्य असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना राज्यसभेचे खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या संबंधित मंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणून देण्याचे आश्वासन देऊन संघटनेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी धुळे येथील कवी आणि गायक भास्कर अमृत सागर यांनी आपल्या आपल्या संचासह संगीतमय कार्यक्रमाद्वारे समाज व शैक्षणिक प्रबोधनाचे गीते सादर केली. खुल्या अधिवेशनाचे उद्घाटन प्रा. आ. जोगेंद्र कवाडे यांनी केली. त्यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणावर टीका केली. अध्यक्षस्थानावरून बोलताना आ. प्रकाश गजभिये यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला. मागण्या मान्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून प्रसंगी घेराव करून त्यांच्याकडून मागण्या मान्य करण्यासाठी ते संघटनेसोबत असल्याचे सांगितले.
संघटनेची भूमिका व कार्य राज्य सरचिटणीस प्रवीण मेश्राम यांनी प्रास्ताविक भाषणातून विशद केली. अधिवेशनात मागासवर्गीय (एस. सी., एस. टी., ओबीसी) शिक्षकांचा अनुशेष त्वरित भरण्यात यावा, नोव्हेंबर २००५ नंतर नोकरीवर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, जिल्हा परिषदेच्या वर्ग ६ ते ८ च्या शाळेमध्ये पटसंख्या निकष न लावता पदवीधर शिक्षकांची नेमणूक करावी, निवड श्रेणी सर्वच पात्र शिक्षकांना लागू करण्यात यावी, केंद्र प्रमुखाची रिक्त पदे शिक्षकांमधून पदोन्नतीने भरण्यात यावी, सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यात यावी, कॅशलेस वैद्यकीय सेवा त्वरित लागू करण्यात यावी, सर्व जिल्हा परिषदांमधील शिक्षक संवर्गाचे रोस्टर त्वरित मंजूर करण्यात यावे. संवर्ग निहाय रोस्टर अन्वये मागासवर्गीयांना तत्काळ पदोन्नती देण्यात यावी, सरळ सेवा भरती करताना गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या मागासवर्गीयांना ५० टक्के खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे, आदी मागण्या अधिवेशनात मांडण्यात आल्या. मंचावर संघटनेचे रवींद्र मस्के, नीलकमल मेश्राम, सुनील बोरकर, शेषराव कांबळे, सुभाष कोल्हे, शालिनी बारसागडे, तसेच विविध जिल्ह्यातील अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. शेषराव कांबळे यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, सदस्यगण आणि शिक्षकांनी सहकार्य केले.