श्रीगंगानगर : वृत्तसंस्था – भारत-पाकिस्तान सीमारेषेवर भारतीय सुरक्षा दलातील जवानांमध्ये झालेल्या वादातून घडलेल्या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. BSF जवान आणि उपनिरीक्षक यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यानंतर हा वाद टोकाला गेला. याच वादातून हवालदाराने अधिकाऱ्याचा गोळी घालून खून केला. यानंतर त्याने स्वत:ला गोळी मारून घेत आत्महत्या केली. या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
रेणुका पोस्ट येथे तैनात असलेल्या बीएसएफच्या 125 व्या बटालियनचे हवालदार शिवचंद्र राम आपलं कर्तव्य बजावत असताना हा प्रकार घडला. रविवारी (दि.3) सकाळी शिवचंद्र राम आणि उपनिरीक्षक रणवेंद्र पाल यांच्यातील वाद उफाळून आला. हा वाद एवढा टोकाला गेला की हवालदार शिवंचंद्र राम यांनी आपल्या रायफलमधून पाल यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हवालदार राम यांना गेट उघडण्यास पाल यांनी सांगितले होते. गेट उघडायला उशीर झाल्यानं त्यांच्यात वाद झाले.
गेट उघडण्यास उशीर झाला, यावरून दोघांमध्ये वाद झाला. ड्युटीवर तैनात असलेल्या बीएसएफच्या या दोन जवानांमध्ये हाणामारी झाली. यामुळे संतप्त झालेल्या हवालदाराने अधिकाऱ्यावर आपल्या रायफलमधून गोळ्या झाडल्या. यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी पोहचलल्या बीएसएफ अधिकाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. मृत उपनिरीक्षक रणवेंद्र पाल हे उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद तर हवालदार शिवचंद्र राम हे हजारीबाग झारखंडचे आहेत.
एनपी न्यूज24 नेटवर्क