मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. या प्रकरणावरून पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची बदली करण्यात आली. त्यानंतर विविध घडामोडी घडल्या. त्यातच मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली झाली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली.
सचिन वाझे यांचे नाव स्फोटक प्रकरणात आल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी झाली होती. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. मात्र, यामध्येच परमबीर सिंह यांना पदावरून दूर करण्यात आले. त्याबाबत नवाब मलिक यांना परमबीर सिंह यांची बदली का करण्यात आली?; असा सवाल विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंह यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा डागाळली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांची ती विश्वासार्हता जपण्यासाठी परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली आहे’.
दरम्यान, कोरोना परिस्थितीविषयीही नवाब मलिक यांनी विधान केले. त्यांनी सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यावेळी 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लसीची मान्यता द्यावी, अशी मागणी केल्याची माहिती मलिक यांनी दिली.
मुंबईत लॉकडाउनचा निर्णय नाही
मुंबईत लॉकडाउन होणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. त्यावर मलिक म्हणाले, ‘मुंबईतील लॉकडाउनबाबत अद्याप कोणाताही निर्णय झाला नाही. मात्र, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले नाही तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही ते म्हणाले.