बहुजननामा ऑनलाईन- 10 दिवस सुरू असणारा गणेशोत्सव संपला आहे. 10 दिवसांनंतर गणपतीच्या विसर्जनाची परंपरा आहे. परंतु 10 दिवस घरात ठेवलेल्या गणपती बाप्पाचं विसर्जन का केलं जातं? असं करणं गरजेचं आहे का ? असं म्हणतात की, महाभारत हा ग्रंथ गणपतीने लिहिला होता.
महर्षी वेद व्यास यांनी गणपतीला 10 दिवस महाभारताची कथा ऐकवली आणि गणपती ती कथा लिहू लागले. 10 दिवसांनी जेव्हा महर्षी वेद व्यास यांनी गणपतीला हात लावला तेव्हा गणपतीच्या शरीराचं तापमान खूपच वाढलेलं होतं. व्यासांनी गणपतीला पाण्याच्या कुंडात नेऊन त्यांच्या शरीराचे तापमान कमी केले. यानंतर गणेश विसर्जनाची परंपरा सुरू झाली.
विसर्जनाचा अर्थ हा आहे की, मनुष्याने हे लक्षात घ्यावे की, हे जग एका चक्राच्या रुपात चालतं. जो आला आहे त्याला जावंच लागणार आणि पुन्हा तो परतून येणार. गणपती विसर्जनाशी निगडीत अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी एक म्हणजेच गणपतीला जल तत्वांचा अधिपती मानलं जातं. त्यांच्या विसर्जनाचं मुख्य कारण तर हेच आहे की, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा-अर्चा करून त्यांना पुन्हा पाण्यात विसर्जित केलं जातं. म्हणजेच ते ज्याचे अधिपती आहेत तिथे त्यांना पोहोचवलं जातं.