बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात शेती गेल्यानंतर योग्य तो मोबदला देण्यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्यामुळे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ६ शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हे सर्व शेतकरी बाळापूर तालुक्यातील आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी आम्ही जी जमीन दिली. पण त्याचा योग्य तो मोबदला आम्हाला मिळाला नाही असा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.
या शेतकऱ्यानी विष प्राशन केले तेव्हा अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर हे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या कक्षातच या शेतकऱ्यांनी विष प्राशन केले. या शेतकऱ्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हारुग्णालायत उपचार सुरु आहे.
साजिद इकबाल शेख मेहमूद, अब्जल रंगारी, मुरलीधर राऊत, अर्चना टकले, आशिष हिवरकर, अबरार अहेमद रोशन अहमेद अशी विष प्राशन केलेल्या शेतकऱ्यांची नावं आहेत. या शेतकऱ्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. धुळे-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या विस्तारीकरणात या सर्वांची शेती गेली आहे.
शेतकऱ्यांना या शेतीचा वाढीव मोबदला देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. गेल्या २ वर्षांपासून या शेतकऱ्यांचा सरकारसोबत संघर्ष सुरू आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळणार नसल्याचं पत्र दिलं आहे. त्यामूुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर त्यांच्या कक्षात विष प्राशन केलं. उद्या अकोल्यात मुख्यमंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.