मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री हे एक जबाबदारीचे पद आहे.या संविधानिक पदावर असताना ‘हात धुवून मागे लागू, खिचडी शिजवू, ही कोणती भाषा? वापरणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. संविधानानुसार घेतलेली शपथही विसरले का? अशी टीका करत मंत्रालयात बदल्यांचे दलाल फिरत आहेत असा चिमटाही माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत काढला.
दरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, ही आमची मागणी नाही. पण संवैधानिक यंत्रणा कोलमडणे आणि सत्तेचा गैरवापर ही राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती दिसून येत आहे असेही फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले, सरकारी यंत्रणेमार्फत पत्रकार, विरोधी पक्षांचे कार्यकर्ते, माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्य सरकारच्या कारभारावर सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी प्रकरणात जोरदार ताशेरे ओढले आहेत. अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणातही उच्च न्यायालयाने सरकारी यंत्रणेच्या वर्तनावर कडक शब्दांत भाष्य केले आहे. यातून धडा घेऊन मुख्यमंत्र्यांनी धमकावण्याची भाषा बंद करावी.
अशी भाषा नाक्यांवर वापरतात
सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुलाखत देत असताना वर्षपूर्तीचा आढावा अपेक्षित होता. पुढची दिशा काय यावर काही सांगता आले असते पण ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतींमध्ये धमक्याच दिसल्या. अशी भाषा नाक्यांवर वापरली जाते. विकासाच्या मुद्यावर अजिबात भाष्य न करता धमकीची भाषा वापरली गेली. हे स्थगिती सरकार आहे. मराठा आरक्षणाचा घोळ सरकारने अजूनही सुरूच ठेवला आहे. न्यायालयात वकील हजर राहत नाहीत. शेतकऱ्यांना ५० हजार, २५ हजार रुपये एकरी मदतीची भाषा हवेत विरली.
महाराष्ट्रात कोरोनाबाधित तसेच मृत्यूचे प्रमाण अधिक आहे पण तरीही हि परिस्थिती व्यवस्थित हाताळल्याचा दावा मुख्यमंत्री कशाच्या आधारावर करतात असा सवाल त्यांनीही उपस्थित केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. अतुल भातखळकर यांनी लिहिलेल्या आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कामाचा पंचनामा करणाऱ्या पुस्तिकांचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
राष्ट्रपती राजवट आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न
सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न करून थकल्यानंतर आता विरोधक राज्यात राष्ट्रपती राजवट यावी, असा प्रयत्न करत आहे. आधीच्या सरकारमध्ये मंत्रालयात कोण-कोण दलाल फिरत होते, याची यादी आपल्याकडे असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
फडणवीसांची ती भाषा कोणती
फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे राजकीय विरोधकांच्या कुंडल्या असल्याचे धमकवायचे. ती कोणती भाषा होती? केंद्रीय यंत्रणांचा वापर सूडबुद्धीने केला जात आहे. असा दबाव फारकाळ टिकत नसतो. असे खासदार संजय राऊत यांनी म्हंटले आहे