नवी मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजप नेते गणेश नाईक यांनी पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या एका सभेत कोणाला गुंडांबाबत काही समस्या असल्यास कधीही फोन करा, मला इंटरनॅशनल डॉन ओळखतात, असे वक्तव्य केले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गणेश नाईक यांच्या एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाशी येथील कार्यालयाचे उद्घाटन खासदार सुळे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, युवक अध्यक्ष राजेश भोर, माजी नगरसेविका सपना गावडे, संगीता बोऱ्हाडे, माजी नगरसेवक संदीप सुतार, वैभव गायकवाड आदी उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या, इंटरनॅशनल डॉनसारख्या लोकांशी एखाद्या आमदाराचे संबंध असतील आणि ते जाहीर कबुली देत असतील तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांची तातडीने चौकशी लावावी, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर पारदर्शकपणे महाराष्ट्रातील जनतेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याचे उत्तर द्यावे. कारण नागरिकांची सुरक्षा ही माझी नैतिक जबाबदारी असल्याचे सुळे यांनी म्हंटले.
गुन्हेगारांशी ओळख ठेवणाऱ्या या नेत्यामुळे देशातील आणि नवी मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या संसदीय अधिवेशनात हा विषय मांडणार असून नाईक यांच्या चौकशीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या जागावाटपाचे निर्णय राज्य पातळीवरील घेतले जातील. कार्यकर्त्यांनी मतभेद न ठेवता एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर माजी मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले, शरद पवार यांनी राज्यात जो इतिहास घडविला, तोच इतिहास नवी मुंबई शहरात घडवायचा आहे. तीन पक्षांची ताकद एकत्र आली तर महापालिकेवर आघाडीचा झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईत सत्ता परिवर्तन होणार
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्यांवरही खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, जे पक्ष सोडून गेले आहेत त्यांनी पुन्हा माती करायला पक्षात येऊ नये. जे जिथे गेले आहेत त्यांनी तिथेच रहावे. असा टोलाही सुळे यांनी लगावला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे त्यामुळे तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करायला हवे. जोरदार तयारी करून नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जा. यावेळी नवी मुंबईत सत्तापरिवर्तन होणार, असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला.