मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – एन. चंद्रा यांच्या ‘तेजाब’ या चित्रपटातून जिने प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले अशा बॉलिवूडच्या ‘धकधक गर्ल’ ला कोण आज ओळखत नाही. बॉलिवूडमध्ये माधुरी दीक्षित हिने अनेक अजरामर चित्रपट दिले आहेत. माधुरीने ‘साजन’, ‘हम आपके है कौन’, ‘दिल’, ‘दिल तो पागल है’, असे अनेक यशस्वी चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. तेजाब हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षित हिने मोहिनीचे पात्र साकारले होते. त्यानंतर अनेक पालकांनी आपल्या मुलींचे नाव मोहिनी असे ठेवले होते.
दरम्यान, सिनेमात येण्यापूर्वी माधुरीसाठी तिच्या आईवडिलांनी अनेक स्थळ पाहिली होती. यापैकीच एक होते, सुरेश वाडकर यांचे स्थळ. आपल्या मखमली आवाजाने चाहत्यांना भुरळ पाडणारे सुरेश वाडकर यांना माधुरीच्या आईवडिलांनी तिच्यासाठी पसंत केले होते. माधुरीने लवकरात लवकर लग्न करून सेटल व्हावे, अशी तिच्या आईवडिलांची इच्छा होती. अशात बॉलिवूडमध्ये एक मराठमोळा चेहरा करिअर करण्यासाठी मेहनत घेत होता. या कलाकाराचे नाव सुरेश वाडकर असे होते. माधुरीच्या आईबाबांनी सुरेश वाडकरांकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला. पण सुरेश वाडकर यांनी या स्थळाला थेट नकार दिला होता. कारण काय तर माधुरी फार सडपातळ असल्याचे कारण त्यांनी दिले होते. या नकाराने माधुरीच्या आई- वडिलांना प्रचंड दु:ख झाले होते. एक चांगले स्थळ हातचे गेले, असेच इतर आईवडिलांप्रमाणे त्यांना वाटत होते. पण या नकाराने माधुरीचा मात्र फायदा झाला. कारण यानंतर तिच्या आई- वडिलांनी तिला सिनेमात काम करण्याची परवानगी दिली.
सुरेश वाडकर यांनी आजवर अनेक हिट चित्रपटांना गाणी दिलेली आहेत. यामध्ये सदमा या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. सदमा या चित्रपटामध्ये कमल हसन आणि श्रीदेवी यांची केमिस्ट्री आपण पाहिलीच असेल. मात्र, या चित्रपटातील ‘ये जिंदगी गले लगा ले’, हे गाणे खूप गाजले होते. त्यानंतर सुरेश वाडकर यांनी अनेक गाणी गायली. माधुरी आता आनंदाने संसार करतेय. पती डॉ़ श्रीराम नेने आणि दोन मुलांसोबत ती आनंदी आहे.