बहुजननामा ऑनलाईन टीम : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जस्टीस लोया प्रकरणी एक महत्वाचे विधान केले आहे. यामुळे राष्ट्रीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्र दहा वर्षापर्यंत सुरक्षित ठेवण्यात यावीत यासंबधीची याचिका मुंबई न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे. आता शरद पवार यांनी या प्रकरणावर भाष्य करताना जर मागणी असेल आणि गरज असेल तरच लोया प्रकरणी चौकशी करावी असे, विधान केले आहे.
याबद्दल शरद पवार म्हणाले की, ‘या प्रकरणाची मुळापर्यंत चौकशी करावी अशी भावना महाराष्ट्रातील जनतेची आहे. मला त्याबद्दल अधिक काही माहित नाही, मी त्यासंबंधीचे काही लेख वाचलेले आहेत, परंतू मागणी होत असेल तर सरकारने याबाबत विचार करायवा हवा. याची चौकशी करावी. मात्र काहीच नसेल तर एखाद्या विरोधात आरोप लावणे देखील चुकीचे असेल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
न्या. लोया यांच्यावर सोहराबुद्दीन खटल्याची जबाबदारी होती मात्र त्यांना विष देऊन कट करण्यात आला असा आरोप करत याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात यावे अशी मागणी अॅड सतीश उके यांनी केली होती. मात्र न्या. लोया यांचा मृत्यू नैसर्गिक पद्धतीने नागपूरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता, याविषयी संशय घ्यायला जागा नाही असे म्हणत यासंबंधीच्या चारही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या होत्या. लोया यांच्या मृत्यूनंतर त्या केसमध्ये आरोपी असलेल्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांना क्लीनचीट देत मुक्त करण्यात आले होते. त्यामुळे लोया यांच्या मृत्यूशी शहा यांच्या मुक्तीचा काही संबंध नसावा अशा शंकेमुळे सर्वांचे याचिकेकडे लक्ष लागून होते. त्यानंतर देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना घडली. चार प्रमुख न्यायमूर्तीनी पत्रकार परिषद घेतली होती.
Visit : bahujannama.com