बहुजननामा ऑनलाइन टीम – मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीआधी जादूटोणा करण्याचा प्रकार उघड झाला आहे. 3 जणांचं नाव लिहून झाडाला लिंबू आणि खिळे ठोकण्या आले आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विद्यमान सदस्य अविनाश मारूती असवले यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार केली आहे.
वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीजवळ भैरवनाथ मंदिरासमोर पिंपळाच्या झाडाला अविनाश असवले, भुषण असवले आणि रूषीनाथ शिंदे यांच्या नावानं लिंबाला खिळे ठोकून झाडाला लावले होते. ही माहिती समजल्यानंतर शिवाजी असवले आणि इतर लोक हा प्रकार पाहण्यासाठी गेले. शहानिशा केल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली.
यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिघांच्या नावचे फलक काढून ते नदीत फेकून दिले. समाजात अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांचा शोध घेऊन कडक करावाई करावी अशी मागणी केली जात आहे.
नुकतीच टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष निघाले. त्यामुळं आता सरपंचपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. 19 पैकी 9 सदस्य बाहेरगावी गेले आहेत. कितीही खिळे ठोकले तरी राष्ट्रवादीचाच सरपंच होणार. हा प्रकार सरपंच, उपसरपंचपदासाठीच केला असावा असं शिवाजी असवले म्हणाले आहेत.