जळगाव : बहुजननामा ऑनलाइन टीम – येथील शहरातील रामपेठ बालाजी मंदीर परिसरात दारूड्या मुलासोबत झालेल्या वादात मुलाचा बापाकडून चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना शुक्रवारी रात्री ११ च्या दरम्यान घडली. सौरभ सुभाष वर्मा (वय,२६) असे मृत मुलाचे नाव आहे. तर वडील संतोष बन्सीलाल वर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सुभाष वर्मा हे सोने, चांदीचे व्यापारी असून शनी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालाजी पेठेत ते कुटुंबासह राहत आहेत. मुलगा सौरभ हा दररोज दारू पिऊन घरात वाद घालत होता. शुक्रवारी रात्री १० वाजता सौरभ दारू पिऊन घरी आला. वडील संतोष बन्सीलाल वर्मा यांनी त्याला खडसावले, त्याचा राग आला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला.
दोघांच्या वादामध्ये सौरभने घरातील चाकू आणून वडिलांना धमकावले. दारुच्या नशेत काही याच्याकडून चाकू कोणालाही लागू शकतो, यामुळे वडिलांनी त्याच्या हातातील चाकू हिसकावला असता सौरभ हा वडिलांच्या अंगावर जोरात धावून आला व त्याचवेळी वडिलांच्या हातातील चाकू सरळ सौरभच्या पोटात भोसकला गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला. तातडीने जखमी सौरभला रुग्णालयात नेले असता मात्र त्या आधी त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणावरून वडील संतोष बन्सीलाल वर्मा याना अटक करण्यात आली आहे.