बहुजननामा ऑनलाइन टीम –कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न सध्या इस्लामपूरमध्ये चर्चेत आहे. नगरपालिका व संबंधीत रुग्णांचे नातेवाईक यांच्या अनास्थेपणामुळे मृतदेहांची विटंबना होवू लागली आहे. अर्धवट जळलेल्या मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांकडून लचके तोडले जात असल्याचे भयान वास्तव समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकाराने इस्लामपूर नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. इस्लामपूर शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नगरपालिकची आहे. पण अशा मृतदहांवर अंत्यसंस्कार करण्यास जादा पगार देऊनही कर्मचारी तयार होत नाहीत. संबंधीत रुग्णाचे नातेवाईकही स्मशानभूमीकडे फिरकत नाहीत. त्यामुळे अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार कोणी करायचे हा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यातच मागील 15 दिवसांपासून मृतांची संख्या वाढत असल्याने अंत्यसंस्कार करणाऱ्या यंत्रणा कोलमडल्या आहेत.
इस्लामपूर नगरपरिषदेच्या कापुसखेड नाका परिसरातील स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. या ठिकाणचा एक गंभीर प्रकार एका मृताच्या नातेवाईकानेच मोबाईलमध्ये चित्रीत करुन तो सोशल मीडियात व्हायरल केला. या व्हिडीओत कुत्र्याकडून अर्धवट जळलेल्या मृतदेहाचे लचके तोडले जात आहेत. शिराळा तालुक्यात व्हेंटिलेटरची व्यवस्था नसल्याने नातेवाईकांनी रुग्णाला इस्लामपूर शहरातील एका कोविड उपचार केंद्रात दाखल केले होते. 34 हजार रुपये भरून घेतल्यानंतरही रुग्णाला व्हेंटिलेटर मिळाले नाही. गुरुवारी सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने मृतदेह अंत्यसंस्कारासाठी इस्लामपूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडे दिला.
कर्मचाऱ्यांनी घाईगडबडीत अंत्यसंस्काराचे सोपस्कर केल्यानंतर दुसरा मृतदेह आणण्यासाठी ते निघून गेले. दरम्यान, स्मशानभूमीत आलेल्या नातेवाईकांना अर्धवट जळालेला मृतदेह पाहून धक्का बसला. गंभीर बाब म्हणजे एक भटके कुत्रे अर्धवट जळलेल्या मृतदेहाचे लचके तोडत होते. हा प्रकार पाहून नातेवाईकाने मोबाईलमध्ये चित्रीकरण करून या व्हिडिओद्वारे त्यांनी पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हा प्रशासनाला जाब विचारला आहे. उपचाराअभावी रुग्णांना जिवंतपणी नरकयातनां भोगाव्या लागत आहेत. मृत्यूनंतर त्यांचा अखेरचा प्रवास तरी योग्य पद्धतीने व्हावा, अशी अपेक्षा नातेवाईकांनी केली आहे.