मुंबई : नागपाडा पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा घालून ६ मुलींची सुटका केली. त्यातील तीन मुलींना अवघ्या ६० हजार रुपयांसाठी पुन्हा दलालांच्या ताब्यात देऊन वेश्या व्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार तब्बल १५ वर्षांनी उघडकीस आला आहे. त्यात एका निवृत्त पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिराज शेख यालाही आरोपी करण्यात आले आहे. यात निवृत्त सहायक पोलीस आयुक्त आर छजलानी यांचेही नाव पुढे आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. नागपाडा पोलिसांनी गजानन थोरात ऊर्फ गजीया व रवींद्र राजनारायण पांडे ऊर्फ डब्बा पांडे यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबईत चांगल्या पगाराचे आमिष दाखवून पश्चिम बंगालमधील ३ मुलींना मुंबई आणून त्यांना कामाठीपुरा येथे विकण्यात आले. त्यांना डांबून ठेवून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात होता. रेस्क्यु फाऊंडेशनच्या मदतीने पोलिसांनी या ठिकाणी ११ मार्च २००४ रोजी छापा घालून ३ अल्पवयीन मुलींसह ६ जणींची सुटका केली होती. दरम्यान, दुसऱ्या दिवशी या अल्पवयीन मुलांना बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले नाही. त्यांना चेंबूरच्या बाल सुधारगृहात ठेवण्यात आले. तेव्हा संस्थेने जाब विचारल्यावर तत्कालीन पोलीस निरीक्षक कलंदर शेख याने त्यांना १५ मार्च रोजी समितीसमोर हजर करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, १३मार्च रोजी शेख यांच्या आदेशाने तिघींना बालसुधारगृहातून नागपाडा परिसरात आणून पुन्हा कुंटणखान्यात पाठविल्याची माहिती समोर आली. स्टेशन डायरीत मात्र मुलींना नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याचे नमूद करण्यात आले होते. महिन्याभराने त्या पुन्हा तेथे आल्याचे समजताच रेस्क्यु फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यानी त्यांची सुटका करुन त्यांना पश्चिम बंगालमध्ये नेऊन सोडले होते. तमंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, नागपाडा पोलिसांनी गजानन थोरात याला आता एका प्रकरणात अटक केली. तो तमंगसाठी काम करायचा़ तर पांडे हा दलाल म्हणून काम सांभाळत होता. गजियाकडे चौकशी केल्यावर पोलीस निरीक्षक कलंदर शेख याने ६० हजार रुपये घेऊन मुलींना सोडल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी गजिया, पांडे व शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे कळताच निवृत्त पोलीस निरीक्षक कलंदर शेख हा रुग्णालयात भरती झाला. त्याला जे जे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. याबाबत शेख याने सांगितले की, १२ मार्च २००४ रोजी सहायक पोलीस आयुक्त छजलाणी हे पांडे याला घेऊन आले. पांडे याने छजलाणी यांना तिन्ही मुली अल्पवयीन नसून त्यात एक अर्धांगवायू मुळे आजारी असल्याचे सांगून त्यांना सोडायला सांगितले. तेव्हा छजलाणी यांनीच तिन्ही मुलींना सोडून देण्याचे आदेश दिले. व तसे पोलीस उपनिरीक्षक सोनावणे यांना सांगितले. आपण स्वत: मुलींची कधीच चौकशी केली नाही, असे शेख आता सांगत आहे. तर शेख स्वत:च्या बचावासाठी खोटे बोलत असल्याचा छजलाणी याचा दावा आहे.