बहुजननामा ऑनलाईन टीम
पहाटेच्या सुमारास घरावर वीज कोसळून पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बदलापूर जवळील ग्रामीण भागात घडली आहे. मोरेश्वर कडाळी आणि बुधा कडाळी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान धामणवाडी या आदिवासी पाड्यात ही घटना घडली. या पाड्यात राहणार्या कडाळी कुटुंबीयांच्या घरावर वीज कोसळली होती. त्यामुळे मोरेश्वर आणि बुधा यांचा जागीच मृत्यू झाला.
काल रात्रीपासून अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. कडाळी यांच्या घरावर वीज कोसळली. हे दोघे पती-पत्नी सकाळी उठून घरातील काम करत होते. त्याच वेळेस त्यांच्या अंगावर वीज कोसळली. बाजूच्या खोलीत झोपलेले मुले आई-बाबांना उठवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, ते प्रतिसाद देत नसल्याचे पाहून त्यांनी आपल्या काका काकीला बोलावले तेव्हा हा प्रकार समोर आला. दोघांचे मृतदेह सध्या बदलापूर मधील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. तहसीलदारांनी लवकर पंचनामे करून कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.