मुंबई : बहुजननामा ऑनलाईन टीम – जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची पुन्हा विभागात वर्णी लावण्यावरुन जलसंपदामंत्री जंयत पाटील आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर नाराजी जाहीर केली. बुधवारी जलसंपदा विभागाच्या कामाची फाईल वित्त विभागकडे पाठवण्यावरुन जयंत पाटील यांनी कुंटे यांना धारेवर धरले. असेच काम चालणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करा, असे उद्विग्न उद्गारही त्यांनी काढले. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीतही जयंत पाटील यांनी अशाच प्रकारे मुख्य सचिवांवर निशाणा साधला होता.
यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडल्याच चर्चा सुरु झाली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले कॅबिनेटमध्ये भांड्याला भांडे लागले असेल. पण आमची भांडी काचेची नाहीत. ती फुटणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीत अंतर्गत वाद असल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला आहे. संजय राऊत आज (शुक्रवार) मुंबईत प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते.
कोणत्या मंत्र्याने काय सांगितलं मला माहिती नाही. जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते राज्याचे ज्येष्ठ नेते असून, महाविकास आघाडीमधील महत्त्वाचे मंत्री, अनुभवी नेते आहेत. त्यांनी काल स्वत: पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. कॅबिनेट मध्ये काय घडलं यासंदर्भात बाहेर सांगू शकत नाही. चर्चा झाली असेल काही. बाहेर कितीही कोणीही अफवा पसरविल्या तरी महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे, मजबूत आहे, असे राऊत यांनी सांगितले. दरम्यान यावेळी त्यांनी काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्यासंबधी प्रश्नावर उत्तर देणे टाळले.