मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – “आमचं हिंदुत्व प्रमाणित करण्यासाठी, स्पष्ट करण्यासाठी अन्य कोणत्या पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू, आम्हाला तुमच्याकडून प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही कधीच राजकारण करत नाही. देशात जिथे कुठे गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहील,” असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त राज्यभरातून छत्रपती शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळावर अभिवादन करण्यासाठी शिवसेना कार्यकर्ते आणि नेत्यांची गर्दी झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीसुद्धा स्मृती स्थळावर जात अभिवादन केले. त्यानंतर त्यांना वार्ताहरांनी हिंदुत्वावरून भाजप शिवसेनेवर करत असलेल्या टीकेबाबत विचारले असता, त्यांनी भाजपवर पलटवार केला.
संजय राऊत म्हणाले, “मागील वर्षी याचदरम्यान सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरू होती. लोकांच्या मनात शंका होत्या. मात्र, आज बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर शिवसेनेचा मुख्यमंत्री तेसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या रूपात मानवंदना देण्यासाठी आले आहेत. बाळासाहेब आमच्यात नाहीत ही वेदना कायम राहील. परंतु, बाळासाहेब आमच्यासोबत आहेत आणि सतत राहतील, प्रेरणा देतील असा विश्वास आहे. आजच्या दिवशी शिवसेना प्रमुखांना आम्ही फक्त देहाने निरोप दिला, पण त्यांचे विचार, हिंदुत्व, मराठी बाणा हे सगळं आमच्यासोबत कायमस्वरूपी आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हा वारसा पुढे नेऊ.”
“आजदेखील देशाचं राजकारण ५५ वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी जो बेरोजगारी, भुमिपुत्रांचा मुद्दा मांडला होता, त्यावरती केंद्रित आहे. बिहार निवडणुकीत पाहिलं असेल तर या दोन मुद्द्यांवर विषय केंद्रित राहिले. महाराष्ट्रात बाळासाहेबांनी ५५ वर्षांपूर्वी ठिणगी टाकलेली. प्रत्येक राज्यात भुमिपुत्रांचा विषय राजकारणातला आणि समाजकारणातला महत्त्वाचा मुद्दा ठरतोय,” असेही राऊत यांनी सांगितलं.