मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तसा राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरीही अद्याप युतीचं घोंगडं भिजतच आहे असं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री शिवसेनेनं 135 जागांची मागणी केली आहे. यात 9 जागा मित्रपक्षांसाठी आहेत असं त्यांनी प्रस्तावात म्हटलं आहे. भाजप हा प्रस्ताव मान्य करणार की, स्वबळावर लढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सध्या राजकीय वर्तुळात भाजप-शिवसेना स्वबळावर लढण्याच्या चर्चा सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात विधानसभेतील युतीवर अनेकदा चर्चा होऊनही कोणता तोडगा निघालेला नाही. रविवारपासून युतीत जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे.
लोकसभेत भाजप-शिवसेनेत 50-50 चा फॉर्म्युला होता. राज्यात दोन्ही पक्षांना चांगलं यश मिळालं. आता दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं आहे. यावेळीही शिवसेनेनं 50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार, 135 जागा शिवसेनेला तर 9 जागा मित्रपक्षांना असा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही पक्षात तगड्या नेत्यांची इनकमिंग झाल्याने आता भाजप-शिवसेना स्वबळावर लढण्याच्याही चर्चा आहेत. शिवसेना 135 वरून 130 किंवा 125 जागांवर तडजोड करू शकते. दोन दिवसांत भाजपकडून यावर कळवलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.