बहुजननामा ऑनलाइन : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची ‘जन आशीर्वाद यात्रा’ संपूर्ण राज्यभर सुरु आहे. हि यात्रा आज विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात होती. यावेळी आदित्य ठाकरेंना दिग्रस मतदारसंघातून निवडणुक लढवावी, असा आग्रह दिग्रसचे आमदार आणि मंत्री संजय राठोड यांनी करत, आदित्य यांनी फक्तं उमेदवारीचा फॉर्म भरण्यास यावे आम्हीच त्यांना सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून विजयी करू असं आश्वासनही दिलं. मात्र या निमंत्रणावर आदित्य ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु ‘जन आशीर्वाद यात्रा’ राज्यात जिथे हि जाईल तिथे आदित्य ठाकरेंना निवडणुक लढवण्यासाठी आग्रह धरला जात आहे, हे पुन्हा एकदा समोर आलं.
आगामी विधानसभा निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. विविध पक्षांच्या विविध यात्रा आणि सभांनी त्याला उधाण आलाय. पक्षातील इनकमिंग आणि आउटगोइंगमुळे अनेकांना धक्के बसताहेत. भाजप आणि शिवसेनेची युती जमली असून आता जागावाटपाबद्दल चर्चा सुरू झालीय. कुणाला कुठल्या जागा याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. तर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेना जोरदार प्रोजेक्ट करत असल्याने ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार अशी चर्चा सुरू आहे. यावर जेव्हा आदित्य ठाकरेंना सोमवारी प्रश्न विचारण्यात आल्यावर ते म्हणाले कि जनता देईल ती जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे.’ त्यांच्या या उत्तरामुळे चांगलाच सस्पेन्स निर्माण झाला आहे.
आदित्य यांनी जेव्हा जन आशीर्वाद यात्रा सुरुवात केल्यांनतर, खासदार संजय राऊत यांनी आदित्य यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजक्ट केलं होतं. नंतर आदित्य यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाणार असल्याचीही चर्चा होती. त्यात आता आदित्य यांनी दिलेल्या उत्तरामुळे चर्चेला आणखी उधाण आलं आहे. भाजप आणि शिवसेनेतल्या जागावाटपाच्या चर्चेवरही आदित्य यांनी उत्तर देत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी जी पत्रकार परिषद झाली त्यावेळी सर्व स्पष्ठ होते. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात युती बद्दल चर्चा झाली असून तेच या संदर्भात बोलतील. यावर भाष्य करण्यासाठी त्यांच्यासमोर मी खूप लहान आहे. म्हणून युतीबद्दल मी बोलणार नाही.
आम्ही पक्ष किंवा सरकार म्हणून नेहमीच शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारामुळे कर्जमाफी झाली, मात्र आमचा उद्दिष्ट आता कर्जमुक्ती आणि पीक विमा योजनेसाठीही आम्ही लढत आहोत. सरकारने केलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक त्रुटी आहेत, त्या दूर झाल्या पाहिजे. जिथे सरकार करणार नाही तिथे आम्ही आंदोलन करू असंही त्यांनी सांगितलं. आमच्या समोर कर्ज मुक्ती, विकास, राम मंदिर असे अनेक मुद्दे आहेत जे आम्हाला साध्य करायचे आहेत असंही ते म्हणाले. विरोधी पक्ष आहे कुठे असा सवालही त्यांनी केला. मला त्यांच्याबद्दल बोलायचे नाही. विरोधी पक्षाला जर प्रश्न उचलायचे आहे तर त्यांनी जनतेचे प्रश्न उचलावेत असा टोलाही त्यांनी लगावला.