मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – सुशांत सिंह प्रकरणावरुन महाराष्ट्र सरकार अजिबात अस्थिर नाही. अशा प्रकरणामुळे सरकार अस्थिर व्हायला लागले तर सर्वात आधी केंद्रातील सरकार पडेल, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम असून, त्यांनीच हा तपास पुढे न्यायला पाहिजे. पोलिसांचे मनोबल खच्चीकरण करुन काही तरी लपवण्याची काही लोकांना दुर्बुद्धी सुचल्याच म्हणत, देव त्यांना सुबुद्धी देवो असे संजय राऊत म्हटलं आहे.
संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातील आघाडी सरकार मजबूत आणि स्थिर असून महाराष्ट्रात ऑपरेशन कमळच काय, कोणतेही ऑपरेशन यशस्वी होणार नाही. एखाद्या प्रकरणावरुन कोणतेही सरकार अस्थिर होत नसते. अशी सरकारे अस्थिर व्हायला लागली तर आधी केंद्रातील सरकार पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील प्रश्न सुटतील. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील सर्वच राज्यातील मुख्यमंत्री मोदींच्या पाठीशी आहेत. त्यामुळे राजकारण न करता हा देश पुढे जावा, अशी आमची इच्छा असे राऊत म्हणाले.
तसेच सुशांतच्या वडिलांच्या दोन लग्नावरुन केलेल्या वक्तव्यावर कुटूंबाने माफी मागण्याची मागणी केल्याबद्दल नोटीस पाठवली असल्याचे विचारले असता, संजय राऊत यांनी सांगितलं की, नोटिशीबाबत मला माहिती नाही. अशा रोज शे-पाचशे नोटीस येतात. नोटीस आली का पाहावे लागेल. मला बरीच कामे आहेत, असे सांगतानाच बिहारमध्ये बसून जशी त्यांना माहिती मिळते, तशी मला सुद्धा मिळते आणि त्या आधारावरच मी बोललो. हा सुशांतच्या कुटुंबीयांचा आणि माझा प्रश्न आहे. मी संवेदनशील माणूस असून मला काही चूक वाटल्यास मी त्याच्या कुटुंबीयांशी जरुर चर्चा करेल. यामध्ये मीडियाने मध्ये पडण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं.
नारायण राणे यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले, काही लोक सरकार पडण्याच्या डेडलाईन देत आहेत. त्याला आत्मनंद म्हणतात. महाराष्ट्रा समोर अनेक प्रश्न आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर सहकारी प्रयत्नांची शर्थ करुन राज्याला पुढे नेण्याचं काम करत आहेत. कोणाला सरकार पाडणं अथवा अस्थिर करण्यात रस असेल तर त्यांनी जनतेच्या दुःखावर जरुर पोळ्या शेकाव्यात. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. येथे जनतेच्या हिताला सर्वात पहिल्यांदा प्राधान्य द्यावं लागतं असं संजय राऊत यांनी म्हटलं.