बहुजननामा ऑनलाईन – देशातील स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्षाचं महत्व कमी करुन चालणार नाही. असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. त्यामुळे ”सामना”तील रोखठोक सदरातील स्वर्ग बदलण्याची स्पर्धा या मथळ्याखाली राऊत यांनी भाजप शिवसेनेत प्रवेश केलेल्या आयारामांचे कान टोचले.
संसदीय लोकशाहीत सत्ताधारी पक्षाला टक्कर द्यायाला तितक्याच ताकदीचा विरोधी पक्ष असायलाच हवा, विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी पक्ष बेफामपणे वागेल. त्यामुळे देशाची वाटचाल एकाधिकारशाहीकडे होते. राज्यात युतीचंच सरकार येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, विरोधी पक्षातील नेत्यांच्या पक्षांतरामुळे विरोधी पक्ष उरेल की नाही असा प्रश्न पडला आहे. कालपर्यंत कॉंग्रेस राष्ट्रवादीला स्वर्ग समजणारे आज नव्या स्वर्गाच्या दारात रांगा लावताना दिसत आहेत. अशी स्वर्ग बदलण्याचा स्पर्धा लोकशाहीचा नरक करेल. सध्या उठसुट कोणी भाजपमध्ये तर कोणी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी सोडण्याची दिलेली कारणेही हास्यास्पद आहेत. कोणताही सारासार विचार न करता त्यांनी पक्षांतर केले आहे. यांपैकी काहीनी अनेकदा पक्ष सोडला आहे. त्यामुळे आजचे आयाराम उद्याचे गयाराम होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
महाराष्ट्रात अनेक मतदारसंघ आहेत. जिथे कॉंग्रेस राष्ट्रवादीला उमेदवार मिळतील का ? असा प्रश्न पडला आहे. आधीच्या पक्षात असताना जे मिळविले तेच घेऊन आता ते पक्षातंर करत आहेत आणि तेही जुन्या दैवतांना स्मरुन पक्षांतर करीत आहेत. आधीच्या पक्षांतर केलेल्या नेत्यांनीही अशीच कारणे दिली. तर पद्मसिंह पाटील, पिचड, साळुंखे, सोपल, जाधव आदींना शरद पवार यांनाच दैवत असल्याचे सांगून त्यांनी पक्ष बदलले. यापुर्वी यातील प्रत्येकाने भाजप- शिवसेनेवर टिका केली आहे. यांना जर पाच टक्के जरी स्वबळावर निवडून येण्याची खात्री असती तर त्यांनी पक्षांतर केले नसते.