बहुजननामा ऑनलाईन टीम : भाजपची साथ सोडत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी सत्ता स्थापन करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे १७ आमदार नाराज असल्याची चर्चा आहे, याच पार्श्वभूमीवर शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिंदे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट महत्वाची मानली जात होती. दरम्यान, ‘शिवसेनेचे १७ आमदार नाराज असल्याची बातमी खोटी आहे. आमचा कोणताही आमदार या निर्णयाबाबत नाराज नसून सर्व आमदार पक्षासोबत आहेत,’ असा खुलासा शिंदे यांनी यावेळी केला.
दरम्यान, महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून एनडीएतून बाहेर पडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या निर्णयाला अजूनही अंतिम मंजुरी मिळालेली नाही. अशातच आता महाशिवआघाडीच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे १७ आमदार नाराज असल्याची माहिती मिळाली होती. शिवसेनेनं हिंदुत्त्वाचा मुद्दा सोडण्यावरून या आमदारांमध्ये नाराजी असल्याचं समजते आहे, त्यामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी या नाराज आमदारांना घेऊन मातोश्रीवर दाखल झाले असून या नाराज आमदारांची समजूत काढण्यात येत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, महाशिवआघाडीवरून मतभेद असलेले शिवसेनेचे आमदार हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातील आहेत, आणि हा भाग राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे स्थानिक समीकरणं लक्षात घेऊन हा विरोध केला जात असल्याची चर्चा रंगवली जात आहे.
Visit : bahujannama.com