मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या वर्षी प्रमाणे आताही कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होताना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, आता लॉकडाऊन लावण्याचीही शक्यता राज्यात वर्तवण्यात आली आहे. तर कोरोनाच्या परिस्थितीवर आता शिवसेनेने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नागरिकांना विनंती करत लॉकडाऊन टाळता आलं तर बघा, असे शिवसेनेनं जनतेला आवाहन केलं आहे.
तसेच कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्ये विषयी आणि लॉकडाऊन विषयी शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केलं आहे. राज्य परत एकदा डाऊनच्या दिशेने जात आहे काय? असे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनावर लस आली आहे. लोक रांगा लावून लस घेत आहेत. लस आल्यामुळे लोकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असतानाच महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत, त्यात महाराष्ट्राचा आकडा जास्त आहे ही बाब चिंता करण्यासारखीच आहे. तसेच अनेक शहरात काही प्रमाणात निर्बध लागू केले आहे. ठाणे, नाशिकसारख्या शहरी भागांत कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’ निर्माण झाले, असं सामनातून म्हटलं आहे.
शिवसेनेने पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकांवरुनही टीका केली आहे. तर मुंबईत कोरोना वाढला त्याचे खापर ‘लोकल ट्रेन्स’वर फोडले जात आहे. तसे असेल तर दिल्लीतही ‘मेट्रो’ सुरू आहेत. लोकांनी स्वयंशिस्त पाळायला हवी. स्वतःवरच काही निर्बंध घालून जगायला हवे, तसेच पंतप्रधान हजारोंच्या सभा घेतात, गृहमंत्री शहा ‘रोड शो’ करतात म्हणून ते स्वातंत्र्य सामान्य नागरिकांना नाही. लोकांनी स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायलाच हवी. दिल्लीश्वरांना कदाचित दैवी शक्ती प्राप्त झाल्यामुळे ‘करोना’ त्यांना स्पर्श करीत नसेल, मात्र सामान्य लोंकांचे तसे नाही. काळजी घ्या अन्यथा कडक निर्बंध लागू शकतात. असं इशारा सामनातून दिला आहे.
दरम्यान, विदर्भ- मराठवाड्यातील अनेक भागांत चिंता वाटावी अशा पद्धतीने कोरोना वाढत आहे. तर मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरसारख्या शहरांत लोकांनी गर्दी केली. बाजार, मॉल्स, लग्न समारंभात निर्बंध पाळले नाहीत. मंदिरे उघडायला लावली. लोकल ट्रेन्स सुरू करण्याचा आग्रह धरल्यामुळे करोना वाढला, असे जे बोलले जात आहे ते खरे मानले तर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचारात उसळलेल्या गर्दीत करोना चिरडून मेला काय ?, असा प्रश्न शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.