पालघर : बहुजननामा ऑनलाईन – सध्याची परिस्थिती पाहता भाजपाची सत्ता पुन्हा येईल असे अजिबात दिसत नाही. सत्तेत शिवसेना भाजपाची प्रेयसी म्हणून भूमिका बजावत असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पालघरमध्ये सोमवारी केली.
आंबेडकर व खा. असदुद्दीन ओवैसी यांच्या ‘सत्ता संपादन संकल्प’ सभेचे आयोजन पालघरच्या डॉ. आंबेडकर मैदानात केले होते. काँग्रेस जो पर्यंत आरएसएसला घटनेच्या चौकटीत आणण्याचा आराखडा देत नाही. त्यांच्या विरोधात लढण्याचे जाहीर करीत नाही तो पर्यत काँग्रेसशी कुठलीही चर्चा आम्ही करणार नाही. असे त्यांनी सांगितले.
त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करीत विकास करायचा असेल तर ठेकेदार नसलेला मुख्यमंत्री असावा असे ते म्हणाले. आजपर्यंत आदिवासीच्या विकासासाठी १४ हजार कोटींचा निधी खर्च झाला. एवढ्या पैशात पालघर आणि नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण दूर झाले असते. परंतु समस्या ‘जैसे थे’ असल्याने एवढा कोट्यवधींचा निधी गेला कुठे? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
कोळी, आगरी, भंडारी या समाजाने आज पर्यंत इतर समाजाचे लोकप्रतिनिधी निवडून देण्याचेच काम केले. स्वत:चा उमेदवार निवडून येईल याकडे कधी गांभीर्याने पाहिले नसल्याचे सांगितले. समुद्रातील जलवाहतूक, पर्यटन, नौदल, सागरी सुरक्षा दल, सागरी पोलीस ठाणे, ओएनजीसी आदी विभागातल्या नोकरीत मच्छीमार समाजाला ३० टक्के आरक्षण देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.