मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवाजी पार्कवर सभा म्हणजे जणूकाही शिवसेनाचा दसरा मेळावाच. असंच काही चित्र आजवर पाहायला मिळते होते. पण शनिवारी झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या ओबिसी आरक्षण परिषद सत्ता परिवर्तन सभेच्या अलोट गर्दीने या समीकरणाला छेद दिला असून शिवाजी पार्क ने नवे बाळासाहेब पहिले.
या सभेला दलित, मुस्लिम बांधावांसह कोळी बांधवांची मोठी गर्दी झाली होती. या जाहीर सभेत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मार्गदर्शन करून संविधान बचाव चा नारा दिला. शिवाजी पार्कचा कानाकोपरा हा हिरवा, निळा, पिवळा, भगवा, लाल, झेंड्यांच्या विविध रंगाने सजल्याचा पाहायला मिळाला. सर्वत्र हे झेंडे फडकत होते.
शिवाजी पार्कने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट जाहीर सभा वर्षानुवर्षी पहिल्या आहेत. दसऱ्याला शिवसेनेचा होणारा मेळावा हा सर्वाधिक गर्दीचा मेळावा म्हणून गणला जात होता. त्यामुळे शिवाजी पार्क आणि बाळासाहेब असेच समीकरण होते. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस ची स्थापना झाली त्या निमित्ताने शिवाजी पार्क वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला अलोट गर्दी झाली होती. या अश्याच गर्दीचा प्रत्यय शनिवारी वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता परिवर्तन सभेच्या निमित्ताने परत एकदा देशाला पाहायला मिळाला. पोलिसांच्या अंदाजानुसार या सभेला १० लाख लोकांनी गर्दी केली होती. त्यानिमित्ताने शिवाजी पार्कने बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने बाळासाहेब पहिले.
या सभेत ओवेसी यांनी पुलावामा दहशतवादी हल्ला हा मोदी सरकारचा पराभव असल्याची टीका केली. ते म्हणले, पुलावामा मध्ये झालेला भ्याड हल्ला हा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. हल्ला झाला तेव्हा देशातील सुरक्षा यंत्रणा काय करत होत्या. याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे. पाकिस्तानी मंत्री म्हणतो कि, युद्ध झाले तर मंदिरातील घंटा वाजणार नाही. तुम्ही देशाला ओळखले नाही. येथे जोवर मुस्लिम आहे तोवर मशिदीतून अजान, मंदिरातून घंटानाद, चर्च, गुरुद्वारा मधून प्रार्थनेचे सूर उमटत राहतील. जेव्हा देशाचा प्रश्न येतों, तेव्हा आम्ही सर्व एक असतो. असेही असदुद्दीन ओवेसी म्हणाले.
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आरएसएस च्या धर्माची सत्ता आली. मात्र भटक्या विमुक्तांकडे भिक्षेशिवाय जगण्याचे साधन नाही. हा हिंदू नाही का ? शिसेना, भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जनतेचे ऐकण्यास तयार नाहीत. हे सर्व पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.